अमरावती: प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ज्या दिवसाची निवड करतात त्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी अमरावतीच्या एका महाविद्यालयात अनोखे चित्र पाहायला मिळाले. चांदुर येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जागतिक प्रेमदिनी प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा अनोखा निर्धार केला. विद्यार्थींना देण्यात आलेल्या या शपथीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन’ अशा तीव्र भावना पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल्या या विद्यार्थिनी?
‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते’
