मुंबई: ‘राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,’ असं ‘वंचित’चे नेते ऍडव्होकेट. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली. भारिप बहुजन महासंघ व ‘एमआयएम’च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आंबेडकरांनी आज ‘एकला चालो रे’चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.
काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल अल्टिमेटम दिला होता. त्यांनी काँग्रेसला १४४ जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसला ही ऑफर मान्य नसल्यानं आघाडी होण्याची शक्यता मावळली. यानंतर आता आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. ‘काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता. मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे’, अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. मात्र त्या प्रस्तावाचं अजूनही उत्तर आलेलं नाही. आता आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही,’ असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या चर्चेची दारं बंद केली आहेत. आता आम्ही युतीच्या भानगडीत न अडकता आमची वाटचाल सुरू केली आहे. गणपती विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत,’ अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
