मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.

याबाबत नवाब मलिक यांनी सांगितले की, राज्यात ओला दुष्काळ आला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रपती राजवट सुरु असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी उद्या दुपारी ३ वाजता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला राजभवनावर जाणार आहे असं त्यांनी सांगितले.

मात्र, भाजपाला याची चुणूक लागताच देवेंद्र फडणवीस लगबगीने राज्यपालाच्या भेटीला गेले आहेत. तत्पूर्वी अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू पुढे सरसावले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी त्यांनी मोर्चा काढला. राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने परिसराला पोलीस छावणीचं रुप आलं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्याने तसंत कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यासंबंधी बोलताना बच्चू कडू यांनी आपण पाच लोक घेऊन मंत्रालयात चाललो होतो, पण पोलिसांनी त्यासाठीही नकार दिला. सरकार नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पाच दिवसांत निर्णय दिला नाही तर न सांगता राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.

शिवसेना-एनसीपी-काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार असल्याने फडणवीस लगबगीने राज्यपालांकडे