नवी दिल्ली: लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘लोकसभेत जे झालं, ते विसरून जा. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा शिवसेनेची भूमिका सर्वांपुढं येईलच,’ असं शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये स्पष्टता दिसत नाही. आम्ही बाजूने मतदान केलं. ते का केलं? सरकारच्या बाजूने केलं म्हणजे देशभक्ती नाही. घुसखोरांना बाहेर काढावे ही आमची भूमिका. जोपर्यंत त्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शिवसेनेने काय करावे हे कुणी सांगू नये. ३७० कलम काढले त्याचे सर्वप्रथम अभिनंदन आम्ही केले, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावश्यक मुद्यांवर सरकारने अधिक लक्ष द्यावे, नकोत्या प्रश्नांत गुंतवून मुद्दे भरकटवू नयेत , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ”नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जर देशातील नागरिक घाबरत असतील, तर त्यांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे,”असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Citizen Amendment Bill Chief Minister Uddhav Thackeray response support given on Citizen Amendment Bill in Loksabha

केंद्राने जनतेच्या जीवनावश्यक मुद्यांवर लक्ष द्यावे, नको त्या प्रश्नांत लोकांना भरकटवू नका: मुख्यमंत्री