मुंबई: शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा अखेर पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र ज्या गोष्टीची अवघ्या राजकीय विश्वात उत्सुकता आहे, त्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. कोणता पक्ष कोणत्या आणि किती जागा लाढवणार हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या असून, मित्रपक्षांसहित भाजपकडे १६४ जागा आल्या आहेत.

मागील ५ वर्षे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने राज्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले असून, राज्यातील विधानसभा निवडणुकीतही महायुती कायम ठेवण्यात येणार आहे. निर्णयात आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत हे मित्रपक्षांचे नेतेही सहभागी आहेत, असे चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खूप कमी दिवस शिल्लक असल्याने आणि नेमक्या कोणत्या जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत ते अजून स्पष्ट न झाल्याने उमेदवारीसाठी हातपाय मारणाऱ्या शिवसैनिकांची धाकधूक वाढल्याने मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. मात्र एकाबाजूला पक्ष वाढवणारे मातोश्रीच्या गेटवर ताटकळत पडलेले असताना दुसऱ्या बाजूला, आयत्यावेळी पक्षात आलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आतमध्ये बोलावून एबी-फॉर्म दिल्याने अनेक जुन्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या आयात उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

आयातांना एबी-फॉर्म मिळाले, तर सच्चे शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर वेटिंगवर