मुंबई: आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘उच्च न्यायालयाने या प्रश्नावरील आमची याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळली असून सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सुचवले आहे. त्यामुळे आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊ’, असे ‘वनशक्ती’चे याचिकादार डी. स्टॅलिन यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

दरम्यान, ‘मेट्रो ३’साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणं हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार आहे. झाडे तोडण्यासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांना ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,’ असा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चढवला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य यांनी शिवसैनिकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. ‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘आरे’मध्ये झाडे तोडणाऱ्यांना ‘पीओके’मध्ये पाठवा: आदित्य ठाकरे