मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही हालचाल सुरु नव्हती. मात्र राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपा विरोधी बाकांवर बसले आहे. त्यामुळे एकंदर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
याबाबत मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक राजगडावर पार पडली. त्यात बाळा नांदगावकर, जयप्रकाश बाविस्कर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी होणाऱ्या धुळे, औरंगाबाद, बदलापूर, कल्याण-डोंबिवली अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची रणनीती काय असावी यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे लवकरच घेतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला पुढे काय करायचं याची रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली अशी माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीबाबत आम्ही तटस्थ भूमिकेतून पाहत आहोत. विचारधारा सोडून दुसरीकडे वळतोय हे लोकांना न पटणारं आहे. जे काही झालं ते लोकांना फारसं पटणारं नाही, जो काही निर्णय असेल राज ठाकरे लवकरच घेतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला पुढे काय करायचं याची रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली अशी माहिती त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ‘भारताला १९४७ साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ साली मिळालं आणि आता २०१९ साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे असं म्हटलं होतं. तसेच मोदीमुक्त भारत आणि मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीसोबत ठराविक मतदारसंघापुरती छुपी युती करून मनसेला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची संधी द्यावी असं मतदाराला आवाहन केलं होतं.
आज लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरे यांच्या आवाहनाचा दाखला घेतल्यास भाजपाला बाजूला करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही प्रमुख पक्ष इतर लहान पक्षांसोबत सत्तेत आले आहेत. लोकसभा निवडणूक मनसेने लढवली नव्हती तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करते वेळी सभागृहात तटस्थ राहिली आणि ज्या भाजपाला विरोध केला त्यांच्याबाजूचा बाकावर सभागृहात विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला.
एकूण मनसेतील सध्याचा परिस्थितीचा अभ्यास केल्यास तळागाळातील सामान्य कार्यकर्ते आजही राज ठाकरे यांच्यासोबत ठाम पणे उभे आहेत, मात्र पक्षातील खरी संभ्रमावस्था दिसते ती नेते पदावरील पदाधिकाऱ्यांची आणि अगदीच प्रसार माध्यमांच्यासमोर प्रतिक्रिया देताना काही प्रश्नार्थक चिन्हं उभं राहिल्यास, राज ठाकरे योग्यवेळी सर्वकाही स्पष्ट करतील अशा प्रतिक्रिया मागील अनेक वर्ष देताना दिसत आहेत आणि तेच मनसेच्या अपयशातील अनेक कारणांपैकी एक कारण वारंवार समोर येताना दिसत आहे. इतर पक्षांमध्ये नेते मंडळी जशी प्रसार माध्यमांच्या समोर आणि प्रतिस्पर्धी पक्षातील नेत्यांविरुद्ध पक्षासाठी खिंडार लढवताना दिसतात ते मनसेत कधीच दिसत नाही.
वास्तविक कुष्णकुंज’वरील कार्यकर्त्यांची रोजच्या भेटीगाठी पाहता राज ठाकरे यांच्यावर पार्टटाइम पॉलिटिक्सचा आरोप केला जातो तो खरा नसून, मनसेत मुळात पार्टटाइम नेते मंडळींचा भरणा जास्त झाल्याचं राजकीय विश्लेषक मानतात, अपवादात्मक एखादा नेता सोडल्यास बाकीचे नेमके कुठे पक्षविस्तार करत असतात तो संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण नैतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील मुख्य दुवा ही पक्षातील नेतेमंडळीच असतात आणि तिथेच नेमका गॅप असल्याचं दिसतं. याच नेतेमंडळींसाठी आधी शिबीर घेण्याची आवश्यकता आहे आणि स्थानिक पातळीवरील पक्षवाढीचे धडे त्यांना पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांच्यामार्फत देण्याची गरज आहे असं ठाम मत मांडता येईल, अन्यथा मनसे पक्षाची देखील अशीच ५-५ वर्ष प्रत्येक निवडणुकीनंतर वाया जाताना दिसतील, असं सध्याचं समाज माध्यम केंद्रित राजकारण दिसत आहे.
