मुंबई-ठाणे : मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलाशयांमध्ये केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं आगमन झालेलं नसून, अजून देखील उन्हाच्या झळा पोहोचत असून उकडाच कायम आहे. परिणामी उरलेल्या पाण्याची बाष्पीभवनाने अजूनच घट होत आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.

मुंबईकरांना दररोज उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून ३,६५० दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण संकुलात आणले जाते. शुद्धीकरणानंतर मुंबईकरांना ३,५१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी १३५ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. या सातही तलावांमध्ये २६ जून रोजी सकाळी ६ वाजता सुमारे ७३ हजार ७८४ दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी एकूण २ लाख ५३ हजार ०४३ दशलक्ष लिटर पाणी तलावात होते.

संपूर्ण जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे पालिकेच्या जल विभागातील अधिकारी प्रचंड चिंतीत झाले आहेत. दरवर्षी साधारण सात जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होतो. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात होते आणि हळूहळू जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईकरांची तहान भागविणारे तलाव एकामागोमाग एक भरून ओसंडून वाहू लागतात. मात्र यंदा जूनमध्ये तुरळक सरी कोसळल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

मुंबई, ठाण्यावर भीषण पाणीसंकट; केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक