मुंबई: मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.

मागील तीन वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून मुंबईत नाईट लाईफची चर्चा सुरु होती. मुंबई महापालिकेत त्यासंदर्भातली प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइटलाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सध्या शिवसेनेसोबत महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादीने आदित्य ठाकरेंच्या नाईट लाइफच्या प्रस्तावाला प्रचंड विरोध केला होता. विशेष म्हणजे त्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने मुंबईतील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करत नाईट लाईफच्या प्रस्तावावर टीका करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली होती आणि राष्ट्रवादीचा नाईट लाईफला तीव्र विरोध असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्याने आणि शिवसेनेच्या सोबतीने आगामी मुंबई आणि नवी मुंबईतील महानगर पालिकेच्या निवडणूका लढविण्याची योजना आखात असल्याने त्यांचा विरोध मावळला असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

जगभरातील अनेक महानगरांत नाइटलाइफची व्यवस्था आहे. तशी मुंबईतही हवी, असा विचार मांडत आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. वर्षभरापूर्वी सरकारने याबाबत अधिसूचना काढली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित करीत या उपक्रमाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. आता मात्र प्रजासत्ताक दिनापासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे.

मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच ही संकल्पना त्यांनी मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना पण झाला आहे. त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title:  NCP Party now supporting Shivsena over Night Life had made protest against Aaditya Thackeray in Mumbai.

‘युवराजांचा’ नाईट लाईफचा हट्ट पुरविण्यास राष्ट्रवादी सज्ज? स्वतःची पोस्टरबाजी आज अंगलट