मुंबई: स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

महिल्यांच्या चळवळीला विशेष योगदान देणाऱ्या विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे १९६४ ते १९८३ या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले.

भारतातील विविध मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या निकालात त्यांना यश आले होते. सर्वसामान्यपणे साजऱ्या होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमांना विरोध होता. त्याऐवजी प्रौढ कुमारिका, विधवा, सवाष्ण, नवऱ्यापासून वेगळ्या झालेल्या अशा सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन मतांचे आदानप्रदान करावे असे त्यांचे मत होते.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ग्रोइंग टुगेदर या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी काही जागा हवी म्हणून त्यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती त्यामुळे २००८ साली पुरुष संवाद केंद्र सुरू केलं. त्यांनी महिलांसंबंधित विविध प्रश्नांवर खुलेपणानं चर्चा केली. अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी संस्था व केंद्रे स्थापन केली.

 

Web Title:  Senior social worker Shrimati Vidya Bal passes away.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन