नागपूर: २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. सर्व जगाचं लक्ष याकडे लागून होतं. २०१४ मध्ये जे परिवर्तन जे आलं होतं ते त्यापूर्वीच्या सरकारमुळे होतं की लोकांना परिवर्तन हवं होतं म्हणून होतं याची प्रचिती या निवडणुकीत आली. २०१४ मध्ये ज्या सरकारला निवडलं त्यांना २०१९ मध्ये त्याच सरकारला आणखी मोठ्या संख्येनं निवडून दाखवलं. जनतेनं पुन्हा भाजपावर विश्वास दाखवला. लोकशाहीत जनतेच्या मतांवर शासन चालतं. लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. लोकशाही आम्ही पश्चिमी देशांकडून घेतली असं पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

मॉब लिंचिंगवर बोलताना भागवत यांनी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे दिली. येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले…गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धान सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असे सांगत भारतात लिंचिंग हा प्रकार घडतच नसल्याचे भागवत म्हणाले. मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे असे भागवत म्हणाले.

ज्यांच्यापर्यंत संघ पोहोचलेला नाहीत, त्यांच्या मनात विविध लोक व माध्यमांतून भिती उत्पन्न करण्याचे काम होते. आपले दुष्कर्म लपविण्यासाठी आता तर इम्रान खानदेखील संघविरोधात बोलतो. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो याचा अर्थ संघ मुस्लिम व ख्रिश्चनविरोधी आहे असा होत नाही. संघाविरोधात विकृत आरोप करुन बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. संघाचे हिंदुत्व हे हिंदूंपुरते मर्यादित नाही. तर भारतीय पूर्वजांचे वंशज असलेले व सर्व विविधतांचा स्वीकार करुन एकोप्याने राहणारे सर्वच भारतीय हिंदू आहेत, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

मॉब लिंचिंग शब्द म्हणजे हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र: मोहन भागवत