मुंबई : मुंबई उपनगरात याआधीची अनिल अंबानी यांची रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी समूहाने विकत घेतल्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून आकारण्यात येणाऱ्या वीजदरवाढीविरोधात सध्या विरोधीपक्ष शहरभर आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. त्यानिमित्त आधीच दक्ष झालेल्या भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि तीव्र भावना लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची एका समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, याची दखल घेत फडणवीसांनी तातडीने कार्यवाही करत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्याना दिले आहेत. मागील काही महिन्यांपासून मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी कंपनीकडून अचानक वीज बिलांमध्ये तब्बल ५० ते १०० टक्के इतकी प्रचंड वाढ करण्यात आल्याच्या तक्रारी हजारो नागरिकांकडून येत आहेत. अदानी समूहाच्या कंपनीकडून प्रत्यक्ष मीटर तपासणी न करताच ही वीज बिलं दिली गेल्याने अनेकी सामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडणुका जवळ आल्या असून हा प्रश्न प्रत्येक घराघराशी संबंधित असल्याने मुंबई उपनगरातील भाजपच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो आणि त्यात अदानी यांचं नाव काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदींशी जोडल्याने अधिक रोष व्यक्त होऊ शकतो, अशी शंका मुंबई भाजपला आल्याने त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आता मोदींचे जवळचे असलेल्या अदाणींवर फडणवीस काय दबाव आणणार ते पाहावं लागणार आहे, अशी कुजबुज उपनगरातील विरोधकांमध्ये सुरु झाली आहे.

Adani power group electricity bills are hike by 50 to 100 percent in mumbai suburb