नवी दिल्ली : एअर स्ट्राईकनंतर सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या जवानांचे फोटो खुलेआम भाजपच्या झेंड्याखाली लावले जात आहेत. एकूणच भारताच्या इतिहासात लष्कराचा स्वतःच्या राजकारणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग पहिल्यांदाच होत असावा. परंतु यात भाजपचे कार्यकर्ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच सामील असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ते पाहून आता भाजपवरील लोकांचा संशय धृढ होताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसात लोकं रस्त्यावर उतरून भाजपाला समज देताना दिसले नाही तर नवल वाटायला नको.
पाकिस्तानविरुद्ध कारवाई दरम्यान मिग २१ या लढाऊ विमानाचा अपघात होऊन भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं होतं. मात्र, बहाद्दूर अभिनंदन यांनी पाकिस्तानला स्वतःची किंवा देशाची कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती.
त्यानंतर परिस्थिती चिघळलेली असताना आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. विंग कमांडर अभिनंदन देशात वाघा सीमेवरून सुखरूप परतले, मात्र त्यानंतर त्यांच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मतपेटीसाठी वापर सुरु केल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानच्या ताब्यात असताना पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना खूप मानसिक त्रास दिल्याचे अभिनंदन यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीदरम्यान तुम्ही भारतात कोठे राहता असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मी दक्षिण भारतात राहतो असं उत्तर देऊन सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही राज्याचा उल्लेख करणं टाळलं होतं. मात्र मोदींनी थेट ते तामिळनाडूत राहत असल्याचं प्रचार सभेत सांगितलं. त्यावर विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे. तसेच मोदी याचा फायदा तामिळनाडूच्या लोकसभा जागांवर घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
