मुंबई : आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिर उभारणीसाठी थेट अध्यादेश लागू करण्याची मागणी मोदी सरकारकडे केल्याचे समजते. तसेच अयोध्येतील विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं थेट कायदा करावा, असं सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे म्हटलं होतं.

याच विषयाला अनुसरून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं आहे. अमित शहा आणि मोहन भागवत या दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेत मुख्य म्हणजे राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

bjp president amit shah and rss chief mohan bhagwat meet at mumbai