नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेटकऱ्यांनी अनेकांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यास आणि त्यांच्या कामाबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने ५ वर्ष मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात विराजमान असलेले आरपीआय’चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण कार्यकाळात कोणती विकास कामं केली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सांगू शकतील का? असे सवाल नेटकरी वारंवार करताना दिसत आहे.
देशाची संसद ही सामान्यांचे विषय मांडण्यासाठी असते, परंतु कोणत्याही अधिवेशनात मिळालेला अमूल्य वेळ ते शेरोशायरी वरच व्यर्थ घालवताना दिसले. कॅबिनेट मंत्रिपद असोत किंवा केंद्रातील राज्यमंत्रीपद, त्याचा अधिकाधिक फायदा हा सामान्यांसंबंधित विकासाची कामं करण्यासाठी खर्ची घालायचा असतो. परंतु, लोकसभेच्या आत किंवा बाहेर ते केवळ शायऱ्या करतानाच सामान्यांना दिसले.
सामान्यांनी सुद्धा आठवलेंच्या शेरोशायऱ्या जबरदस्ती का होईना, त्या अत्यंत जड मनाने स्वीकारल्या आणि स्वतःची करमणूक करून घेतली. परंतु, त्यामुळे आठवलेंना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्यातला कवी अधिकच व्यक्त होऊ लागला. परिणामी, कोणत्याही महत्वाच्या आणि गंभीर विषयातील चर्चेत आठवलेंच्या शायऱ्या झेलण्याशिवाय दुसरा पर्याय आज प्रसार माध्यमांकडे आणि सामान्य माणसाकडे नाही, अशीच एकूण परिस्थिती आहे.
परंतु, आपण जनतेचे प्रतिनिधि असून, केंद्रीय मंत्रिमंडळात जवाबदार मंत्रीपदी आहोत. त्यामुळे ५ वर्षात तुम्ही कोणती विकासाची कामं केली, असे प्रश्न विचारण्याचा त्रास प्रसार माध्यमं सुद्धा करत आणि यातच त्या पदाच गांभीर्य कमी होतं. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक ग्रुप्समध्ये नेटकरी आठवलेंकडे असे प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे उद्या जर प्रकाश आंबेडकरांना यश मिळाल्यास, रामदास आठवलेंच्या एकूणच राजकीय अस्तित्वाला धक्का बसल्यास नवल वाटायला नको.
