सांगली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक धक्कादायक आणि मोदी सरकारला पुन्हा गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. ज्या विषयावरून आधीच मोदी सरकारवर प्रचंड टीका झाली असताना, रामदास आठवलेंच्या या विधानाने मोदी आणि भाजप पुन्हा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टप्या टप्याने जमा करणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तो एक चुनावी जुमला असल्याचं म्हटलं होतं तर मोदी या विषयावर कधीच काही बोलले नाही. मात्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा भाजप गोत्यात येण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. धक्कादायक म्हणजे पुढे ते असं ही म्हणाले की, एवढी मोठी रक्कम सरकारकडे नसल्याने, त्यासाठी आरबीआयकडे पैशाची मागणी केली आहे. परंतु, आरबीआयने नकार दिला आहे. त्यामुळे हे पैसे सध्या सामान्यांच्या बँक अकाउंटमध्ये एकत्र टाकले जाणार नाहीत. तर ते टप्प्याटप्प्याने टाकले जातील. त्यासाठी रिझर्व्ह बँकेशी बोलणी सुरु असून लवकरच ते पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं आहे.
