मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर राजीनाम्याच्या काही कागदी होड्या सापडल्या आहेत, अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट पत्रकार परिषदेत केली आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल शरयू नदीच्या किनारी महाआरती झाल्यानंतर त्यांच्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या आणि त्याच होड्या आज पहाटे स्थानिक नागरिकांना सापडल्याचे वृत्त आहे, असं सांगत शिवसेनेच्या राजीनामा नाट्याची विखे पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर केवळ एक स्टंट होता. तसेच असे स्टंट करण्यात आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी पेक्षा कुठेही कमी नाही, हे सिद्ध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असं सुद्धा ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान, दुष्काळाने होरपळलेल्या लोकांना दिलासा देण्याऐवजी इव्हेंट करणे हा जनतेचा विश्वासघात आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे शिवसेनेकडून यावर काय प्रतिउत्तर मिळणार ते पाहावं लागेल.

congress senior leader radhakrishana vikhe patil criticised shivsena on ayodhya visit