नवी दिल्ली : कालच ५ राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेने बोध घेतला आहे असं अजिबात वाटत नाही. कारण, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेचे खासदार राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा देत पोश्टरबाजी केली.
‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, अशा घोषणा शिवसेना खासदारांनी संसद परिसरात दिल्या. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राम मंदिरावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आज संसदेबाहेर महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ शिवसेना खासदारांनी घोषणाबाजी केली.
यावर बोलताना खासदार खैरे म्हणाले की, ‘राम मंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदू लोकांचा आस्थेचा विषय आहे. त्यामुळे सरकारने राम मंदिरासाठी कायदा आणावा’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आम्ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशी मागणी करत नाही. आम्ही याआधी सुद्धा अनेकवेळा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भाग दुष्काळाने हैराण झालेला असताना शिवसेनेला राम मंदिर अधिक महत्वाचे वाटत असून, दुष्काळावरील चर्चेला अधिक प्राधान्य देण्याऐवजी निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण केलं जात आहे असा आरोप विरोधक करत आहेत.
