रांची : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

रांचीमध्ये सुरू असलेल्या ४ दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या उपस्थितांसमोर बोलत होत्या. दरम्यान त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं, की आरक्षण केवळ १० वर्षांकरिता आवश्यक आहे. परंतु आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्न सुद्धा सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. परंतु असं असलं तरी देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे अशी टिपणी सुद्धा त्यांनी जोडली.

जोपर्यंत तुमच्या मध्ये देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे. संसद दिवसेंदिवस आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत तब्बल २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती आणि असं कधीपर्यंत चालणार आहे असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला.

dr babasaheb ambedkar wanted reservation only ten years says sumitra mahajan