जालना : जालन्यातील बीज शीतल सीडस्च्या सभागृहात मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यांमधील शिवसैनिकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करताना रामदास कदम म्हणाले की, मुळात शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना काढली आणि तळागाळातील सामान्यांना नेतृत्वाची संधी देऊन मोठे केले. त्यात मी देखील एक असल्याचे रामदास कदम म्हणाले.
पुढे भाजपवर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, भाजप शिवसेनेच बोट धरून महाराष्ट्रात प्रवेश केला आणि नंतर शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसला हे जनता कधीच विसरणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धडा शिकवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असं पर्यावरण मंत्री रामदास कदम जालन्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणाले. राज्यातील युती टीकली होती ती प्रमोद महाजन व गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळेच. परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.
या मेळाव्याला परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
