मुंबई : भाजपने केलेल्या पक्षाच्या अंतर्गत अहवालात जवळपास ६ खासदारांचा आणि तब्बल ५० च्या आसपास आमदारांचा आगामी निवडणुकीत सुपडा साफ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अंतर्गत गोटातून समजले आहे. त्यामुळे ते बंद लिफाफ्यात भाजपच्या आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
या अहवालानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदार तगडा धक्का देणार असं समोर आलं आहे. भाजपच्या तब्बल ४० टक्के म्हणजे ४५ पेक्षा अधिक आमदारांची ४ वर्षातील कामगिरी अत्यंत खराब असून ते पुन्हा सभागृहात जाणे खूप कठीण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे राज्य भाजपचे धाबे दणाणले आहेत.
आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपने एका तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान, बैठकीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल भाजपाच्या आमदार आणि खासदारांना बंद लिफाफ्यात देण्यात आले. तसेच हा लिफाफा कोणालाही न दाखवता आणि वाच्यता न करता घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आला होते. चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात जवळपास ५० आमदार आणि ६ खासदारांचे पुढच्या निवडणुकीतलं भवितव्य धोक्यात असून स्थानिक मतदार त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
