छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील काल झालेल्या पूल दुर्घटनेत ६ लोकांनी आपला जीव गमावला तर ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. सामान्य मुंबईकर हा नेहमीच भरडला जातो आणि मुंबई स्पिरिट च्या नावाखाली राजकारणी मुंबईकरांना फक्त आणि फक्त मूर्ख बनवत आले आहेत.
तसंच काहीसं आज घडलं आहे, भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी पूल दुर्घटनेसाठी थेट मुंबईकर पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे. टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं. सोबतच सरकारचं याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हाट झटकण्याचा प्रयत्न केला आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
अशा असंवेदनशील प्रतिक्रियांमुळे मुंबईकर हा मूर्ख आहे आणि त्याला स्पिरिट च्या नावाखाली आपण सहानुभूती दिली कि तो दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा आपला जीव मुठीत घेऊन जगायला मोकळा, असं काहीसं राजकारण्यांचं मत झालं असावं. पण मुंबईकरांमध्ये स्पिरिट तर आहेच परंतु रोजच्या कमाईवर हातावर पोट घेऊन जगणारा मुंबईकर जर १ दिवस कमला गेला नाही तर त्याच्या घराची चूल पेटणार नाही हे त्याला माहित असून कोणत्याही परिस्थितीत अगदी बॉम्ब ब्लास्ट झाला तरी सुद्धा मुंबईकर दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामाला लागतो आणि ती त्याची मजबूरी आहे.
