सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचार संहिता हि लागू झाली आहे. परंतु भाजप नेतृत्व आणि नेते, उच्च पातळीवर असो कि खालच्या लेवल ला सगळेच भाजपवाले आचार संहितेचा भंग करताना दिसत आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांच्या विरोधात तक्रार केल्याचे वृत्त आहे.
आचारसंहिता लागू असतानाही अनेक पॅट्रोलपंप, एअरपोर्ट याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स असलेले काही फलक अजून काढले गेलेले नाहीत आणि भाजप नेत्यांकडून लष्कराच्या कामगिरीचा प्रचारासाठी वापर केला जात आहे अशी तक्रार नोंदवली आहे. तसेच राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून अश्लील टीका करण्यात येते अशी नोंद तक्रारीत केली आहे.
आज रात्रीपर्यंत देशभरातील पेट्रोल पंपावर, एअरपोर्टवर नरेंद्र मोदी यांचे किती पोस्टर्स लावण्यात आलेत, पोस्टर्स हटविण्यासाठी यंत्रणा सुरु आहे का याबाबत सविस्तर अहवाल मागवू तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या अश्लिल टीकाटीप्पणीवर रेकॉर्ड मागवण्यात येत आहे असं आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिलं. निवडणूक प्रचारामध्ये सैन्याचा वापर करु नये असे सक्त निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याआधीच देण्यात आल्याचे सांगितले.
दिल्ली काँग्रेस कमिटीने नरेंद्र मोदी आणि आप चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पॅट्रोल पंप, मेट्रो स्टेशन, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स हटविण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.
