बंगळुरू : कर्नाटकच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळाने बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि कर्नाटक सरकारची आस्थापने बेळगावला वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सरकारच्या या हालचालींमुळे सीमाभागात रोष व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेणार ते महत्वाचं ठरणार आहे.
कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव गेली १२ वर्षे विचाराधीन होता. या विषयावर बोलताना विद्यमान मुख्यमंत्री म्हणाले की,’ मी २००६ मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हापासून बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. माझ्या नंतरच्या इतर सरकारांनी या प्रस्तावाचा अजिबात विचार केला नाही. परंतु आता मी पुन्हा या प्रस्तावाचा व तो अमलात आणता येईल का याचा गांभीर्याने विचार करत आहे’, असं कुमारस्वामी म्हणाले.
पुढे कुमारस्वामी म्हणाले की,’ बेलगावीमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचा आपला विचार असून लहान सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी इथल्या लोकांना बेंगळूरला यावं लागू नये असं त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. सीमाभागातल्या मराठी भाषिकांची गळचेपी तसेच शाळांमध्ये कानडीची सक्ती या सारख्या अनेक गोष्टी इथल्या मराठी जनतेवर लादण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा सीमाभागात कानडी-मराठी असं वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह आहेत.
