कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या काळात अगदी नोटबंदीपासून ते पुलवामा हल्ल्यापासून सर्वच गंभीर विषयांमधील वास्तव उघड करायचं असेल तर आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सखोल चौकशी करा, म्हणजे सगळंच सत्य समोर येईल असं खबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. अनेक विरोधकांनी यापूर्वी अजित डोभाल यांच्या मुलाची पाकिस्तानी कंपनीत गुंतवणूक आणि पार्टनरशिप असल्याचा आरोप केला होता.
तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या असून त्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सर्व माहिती असल्याने आधी त्यांची सखोल चौकशी करा, असं राज ठाकरेंच्या आरोपा मागील कारण असल्याचे दिसते.
