तुळजापूर : निवडणुकीपूर्वी आणि सत्तेत येऊन सुद्धा विद्यमान युती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील आश्वासन पूर्ण न केल्याने मराठा समाजात भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात रोष वाढत आहे. त्यामुळेच झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात पुन्हां रणशिंग फुंकणार आहे.
मागील दहा महिन्यात युती सरकारने आरक्षणासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुदानाचे काय झाले? असं प्रश्न सुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पुढे बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले की, कोपर्डी प्रकरण, भव्य शिवस्मारक तसेच शेतकरी कर्जमाफी या सर्वच प्रश्नांवर मराठा समाज मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहे. मात्र यावेळेस मूक मोर्चा नसेल, तर ठोक मोर्चा असेल, असा इशाराच आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
