मुंबई : मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या काही समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांशी बैठक पार पडली. त्यावेळी चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ज्या आंदोलकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद झाले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यावर कारण देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांच्यावरील गुन्हे मात्र मागे घेणार नाही. असे गुन्हे मागे घेतले तर अराजकता माजेल. आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही असं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत खासदार नारायण राणे सुद्धा उपस्थित होते.
तसेच राज्यातील मेगा भरतीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, या भरतीत मराठा तरूण उपेक्षित राहणार नाहीत आणि जर उद्या काही लोक चर्चा करण्यास येणार असतील तर आम्ही चर्चा करू. कारण आम्हाला प्रश्न लवकरात लवकर सोडवायचा आहे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
