पुणे : मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा संबंधित गंभीर विषयाला हात घातला. काही दिवसांपूर्वी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पालक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.

पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना दरवर्षी ह्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. ह्यातला मुख्य प्रश्न आहे, की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे का नाही? १०वी आणि १२वीच्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दिली आहे त्यांना प्राधान्य मिळायला हवं, अशा स्वरूपाच्या कायदा इतर राज्यांनी केला आहे, मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? आज महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाहीये आणि राज्यसरकार ह्या कडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्रातील मुलांना प्रवेश नाकारून, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घुसवायचा प्रवेश सुरु आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प आहेत कारण इथलं सरकार केंद्रातून चालवलं जात आहे. तामिळनाडू मध्ये NEET प्रवेश परीक्षेत तामिळ भाषेतल्या प्रश्नपत्रिकेत काही चुका होत्या, तिथला एक खासदार न्यायालयात गेला, मग कोर्टाने प्रत्येक विद्यार्थ्याला ४ गुण अतिरिक्त देण्याचा आदेश दिला. मग इथले लोकप्रतिनिधी गप्प का? सरकार काय करतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

NEET वैद्यकीय शिक्षणात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवं आणि जर तरीही बाहेरच्या मुलांना प्रवेश द्यायचा प्रयत्न केलात तर ह्या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं लक्ष असेल, ह्याला धमकी समजायची असेल तर समजा असा इशाराच त्यांनी दिला आहे. इतर बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी हे काही आमचे शत्रू नाहीत. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रवेश मिळायला हवा, त्यानंतर जर काही जागा उरल्या तर मग इतर राज्यातल्या विचार करा असा दुजोरा सुद्धा त्यांनी जोडला.

MNS chief Raj Thackeray took a clear stand on NEET Exams in Maharashtra and warn state government