मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्यात राष्ट्रवादीची विशेष ताकद नसताना सुद्धा या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सत्ताकाळात अनुभवातून सध्या भाजप आणि शिवसेनेविरुद्ध नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे नारायण राणे सर्व शक्ती पणाला लावण्याची शक्यात आहे. त्यात त्यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते यांना आगामी निवडणुकीत धोबीपछाड करण्यासाठी सभा आणि प्रचाराचे रान उतावले आहे. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या खासदारांची आणि समर्थकांची संख्या वाढवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणारे नारायण राणे यांना भाजपमध्ये विशेष रस नसून त्यांना काँग्रेस सारख्या राजकारणाचा अनुभव आल्याचे समजते. त्यात त्यांच्यासारखा आक्रमक नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली कितपत काम करेल यात भाजपाला सुद्धा शंका होती. त्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लावणे भाजपाला आणि खुद्द फडणवीसांना सुद्धा पेलवणारे नव्हते.
सध्या राणे कुटुंबीयांनी खासदार विनायक राऊत, मंत्री अनंत गीते, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चांगलीच मोर्चे बांधणी केली असून नारायण राणे स्वतः त्यावर बारीक लक्ष ठेऊन असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लवकरच शरद पवारांसारख्या धुरंदर राजकारण्याशी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संधान बांधून कोकणात राजकीय भूकंप करण्याची योजना आखली जात असल्याचे वृत्त आहे. कोकणात लवकरच या घडामोडी वेग घेतील असे म्हटले जाते.
