नवी दिल्ली : अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. आज नो लोकपाल, नो मोदी’, घोषणांनी संपूर्ण रामलीला मैदान दुमदुमले. रामलीला मैदानावर हजारो शेतकरी आणि अण्णांचे समर्थक मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
आज दुपारी डॉक्टरांनी अण्णांच्या प्रकृतीची तपासणी केली ,त्यावेळी अण्णांचे वजन घटले असून रक्तदाबही वाढला आहे. पण अण्णा अजूनही उपोषणावर ठाम आहेत. व्यासपीठावरून देशभक्तीपर गीते सुरु होती आणि महत्वाचं म्हणजे विविध राज्यातून शेतकरी गोळा होत असून त्यांच्या भाषणांनी आणि घोषणांनी रामलीला मैदान दुमदुमले आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने लागू कराव्या अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
इन्कलाब जिंदाबाद, जय जवान, जय किसान, ‘नो लोकपाल, नो मोदी’, ‘अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ह्या घोषणांनी संपूर्ण रामलीला मैदान दुमदुमले आहे. समर्थकांची वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार किंव्हा दुर्घटना घडू नये म्हणौन रामलीला मैदानावर आणि आजूबाजूच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती हरियाणा आणि पंजाब राज्यातून येत असून, त्यांच्या बसेस अडविल्या जात आहेत. त्यामुळे मोदी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अण्णांनी उपस्थितांना संबोधित करताना केला आहे.
आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून तो आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. देशाच्या हितासाठीच हे आंदोलन असून, सरकार काही कागदपत्र आज पाठवणार आहे. त्याची खातरजमा करूनच आम्ही आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करू असे अण्णा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून अण्णांची प्रकृती खालावत असल्याचे समजते, त्यामुळेच अण्णांच्या आंदोलनाने मोदी सरकार संपूर्ण हादरलं असून कदाचित राजनाथ सिंग यांना सुद्धा चर्चेसाठी पाठवण्यात येईल असे समजते.
