विरार : बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही आणि नेहमी समोरुन लढा दिला. परंतु आज शिवसेनेची आजची स्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही जशी बाळासाहेबांच्या वेळी होती. आजची त्यांची स्थिती पाहून जर सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असं म्हणत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष पणे विरार येथील भाजपच्या सभेत लक्ष केलं.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची निमित्त विरार येथे भाजपच्या प्रचारात थेट उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचारण करण्यात आलं होत. सभेची सुरुवात मराठीत करताना ते म्हणाले,’सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय’. आदित्यनाथ यांच्या भाषणात त्यांनी थेट शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
भाषणात भावनिक मुद्दे उपस्थित करताना ते योगी म्हणाले की, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रचा जुना आणि जवळचा संबंध आहे. कारण भगवान राम यांना देवत्व प्रदान करणारी भूमी पंचवटी महाराष्ट्रात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळी उत्तर प्रदेशच्या काशीतून पुरोहित गागाभट्ट आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांना वेगळं करणारे महाराष्ट्राच्या हिताचं काम करू शकत नाहीत. कारण ते नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतात पण कृत्य अफझल खानासारखी करतात, असं म्हणत थेट शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली.
चिंतामण वनगा हे भाजपचे खासदार होते आणि हा भाजपचा अंतर्गत विषय होता. कारण आम्ही वनगा कुटुंबीयांचा योग्य सन्मान राखला असता, परंतु शिवसेनेने वनगा यांच्या कुटुंबीयांना तोडून त्यांना जबरदस्तीने उमेदवारी देण्याची काहीच आवश्यकता नव्हती असं योगी आदित्यनाथ टीका करताना म्हणाले. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस हे विपरित परिस्थितीत सुद्धा सरकार नीट चालवत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.
