पालघर : पालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पहिल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती, तरी बहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप पहिल्या फेरीपासूनच अग्रस्थनी होती.
एकूणच भाजपचे उमेदवार आयत्यावेळी शिवसेनेत आणण्याची खेळी शिवसेनेवरच उलटल्याचे चित्र आहे. एकूण मतदानात शिवसेनेचा उमेदवार हा तिसऱ्या नंतर दुसऱ्या स्थानी होता. मुख्य चुरस ही भाजपचे उमेदवार विजय गावित, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच पाहायला मिळाली. या पराभवाने शिवसेनेत शांतता पसरली असून २०१९ च्या निवडणुकीपूर्वी सेनेविरुद्ध एक नकारात्मक संदेश गेल्याचे चित्र आहे.
सत्तेत राहून सत्तेतीलच सहकारी पक्षावर आगपाखड करून सत्ता मिळवायची आणि नंतर त्यांच्या बरोबरच सत्तेत सहभागी व्हायचे हे कदाचित मतदाराला रुचले नसावे. परंतु शिवसेना पक्ष प्रमुखांनी सुद्धा येथे मोठा जोर लावून संपूर्ण पक्ष पालघर प्रचारात उतरवला होता. परंतु मतदाराने शिवसेनेला स्पष्ट पणे नाकारले आहे.
