पंढरपूर : देशभरात ईव्हीएम मशीनचा सावळा गोंधळ आणि संभ्रम पाहता पुढचा लढा हा मतपत्रिकेवरील मतदानासाठी असेल असं ते म्हणाले. देशाचं संविधान बदलणं हा भाजपचा मुख्य अजेंडा असून त्यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक ही शेवटची संधी असेल त्यामुळे ते कोणत्यासुद्धा थराला जाऊ शकतात असा आरोप सुद्धा त्यांनी भाजपवर केला आहे. आजही राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाहीत हे उघड दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी.
धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे ‘सत्ता संपादन’ मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकातील राजकीय स्थिती बघता जर काँग्रेसने एक पाऊल माघे घेतल्यास संपूर्ण देशात आज सुद्धा तिसरी आघाडी होऊ शकते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात सत्ता स्थापनेसाठी भाजप अजून कोणत्या पातळीला जाऊ शकते हे खरंच सांगता येणार नाही. परंतु अनेक घडामोडी घडून सुद्धा सत्तेवर येणार काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सुद्धा अस्थिरच असेल त्यामुळे पुढील ३-४ महिन्यात पुन्हा वेगळ्याच राजकीय घडामोडी घडू शकतात असं भाकीत सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी नोंदवलं आहे.
