तेलंगणा : तेलंगणामध्ये एक मोठी राजकीय घटना घडली असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहम यांची भेट घेऊन विधानसभा बरखास्तीची अधिकृत घोषणा करतील.
चंद्रशेखर राव यांच्या धाडसी निर्णयामुळे राज्यात लवकरच पुन्हा विधानसभा निवडणुका होणार हे निश्चित आहे. परंतु मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्यामुळे सर्वच स्थानिक पक्षांची तसेच राष्ट्रीय पक्षांची धांदल उडाली आहे. राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहम यांनी राज्य सरकारचा प्रस्ताव स्वीकारून चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केल्याचे वृत्त आहे.
वास्तविक तेलंगणा राष्ट्रीय समिती सरकारचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंत होता, तरीसुद्धा हा निर्णय घेण्यात आल्याने तेलंगणात जोरदार राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. परंतु जवळजवळ एक वर्ष आधी विधानसभा का विसर्जित करण्यात आली या प्रश्नाने सर्वांनाच विचारात टाकले आहे.
