पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या.

पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग असलेल्या नाल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांत बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप नागरिकांना बसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सीमाभिंत कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात एक ज्येष्ठ महिला आणि २२ वर्षांची तरुणी पाण्यात वाहून गेली. हवेली तालुक्यात सहा जण पाण्यात वाहून गेले आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. शहर आणि जिल्ह्यमध्ये लहान आणि मोठी अशा एकूण आठशेहून अधिक जनावरांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ५ तालुक्यांना फटका बसला. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागातील घरात पाणी शिरलं होतं. या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

मागील २२ वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरणं भरली असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. तुलनेने रात्री झालेला पाऊस किती तरी जास्त होता. यावर्षी जिल्ह्यात १८० टक्के पाऊस झाला आहे. बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला, ज्यात पुणे शहरातील सहा, हवेली तालुक्यातील सहा आणि पुरंदर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

पुणे: बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप पुणेकरांना