पुणे, २० मार्च: कोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोक असावेत. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अजित पवार यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
News English Title: Story Corona Virus crisis in Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar appeal in Pune News latest Updates.
