सिडनी : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत गारद केले आणि इतिहास रचला आहे. आजचा ५वा दिवस सुद्धा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला आणि अखेर शेवटची चौथी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात तब्बल ७२ वर्ष ११ कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताने पहिल्यांदाच कांगारूंच्या भूमीत मालिका जिंकली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने आधीच ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी सामने जिंकून कांगारूंविरुद्ध मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला मोठी कामगिरी करणे अपेक्षित होते.

परंतु सामान्याच्या सुरुवातीपासूनच कांगारू प्रचंड दडपणाखाली दिसत होते. विराट टीमने त्यांना सुरुवातीपासूनच सावरण्याची एकही संधी दिली नव्हती. भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर रचला होता. चेतेश्वर पुजारा १९३ आणि रिषभ पंत १५९ नाबाद अशी खेळी करून भारताची बाजू भक्कम केली होती. आणि अखेर भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला होता.

विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघ १९४७ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत ११ मालिकेत भारताला कसोटी सामान्यांच्या मालिकेत एकदाही विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर आता ७२ वर्षानंतर भारतीय संघाला कांगारूंच्या भूमीत यश आले आहे.

ind vs aus 4th test match india win series by 2 1 after 72 years in australia