ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांचा फारसा अंदाज न आल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वैर मारा केला. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने मार्टीन गप्टीलला माघारी धाडण्यात यश मिळवलं, आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.

कॉलिन मुन्रो, केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजीकरत ५ बाद २०३ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रोने सर्वाधिक ५९ धावा केल्या.

 

Web Title:  India Tour of New Zealand 2020 First T 20 Auckland cricket Match.

India Vs New Zealand T-२०: झीलंडचे टीम इंडियाला २०४ धावांचे आव्हान