जकार्ता : बॅडमिंटनमध्ये भारताचं किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. कारण भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, १५-२१, २१-१० अशा संघर्षपूर्ण लढतीत विजय प्राप्त करत अंतिम फेरी गाठली आहे.
सिंधूच्या या विजयाने भारतासाठी किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. अंतिम फेरीत सिंधूची गाठ चीनच्या तैपेईच्या ताई त्झु यिंगशी पडणार आहे. यिंगने उपांत्य फेरीत सिंधूची साथीदार सायनावर दोन सेट्समध्ये मात केली होती. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत मिळवलेल्या या विजयाबरोबरच सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
आधीच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला चीनच्या तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूकडून भारताला सुवर्णपदकाची आशा होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूसमोर आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचं आव्हान होतं. तसेच या सामन्यात सिंधूला तगडं आव्हान मिळेल असं चित्र निर्माण झालं होतं.
