ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाणे शहरात जंगी सभा पार पडली. ठाण्यात मनसेने अविनाश जाधव, संदीप पाचंगे आणि महेश कदम आणि महेश सुतार यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घातला तसेच जात आणि धर्म पाहून मतदान करू नका असं आवाहन देखील ठाण्यातील मतदाराला केलं.
अविनाश जाधव यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरुद्ध असून अविनाश जाधव यांनी मागील काही दिवसांपासून त्यांना चांगलेच अडचणीत आणलं आहे. सध्या ठाणे शहर मतदारसंघातील राजकीय वातावरण अविनाश जाधव यांना पोषक असून ही जागा मनसेच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच संदीप पाचंगे आणि महेश कदम यांनी देखील अनेक स्थानिक मुद्यावरून ठाण्यात आंदोलन केली असून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले आहेत.
ठाणे आणि नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला त्यातील काही ठळक मुद्दे;
- राज्यात इतक्या गोष्टी घडूनही आपला महाराष्ट्र थंड, लोण्याचा गोळा
- गड किल्ले लग्न समारंभासाठी दिल्यावर येणाऱ्या पीढीला आपण काय सांगणार
- पोलिसांना मोकळीक दिल्यास, शहरातील क्राइम रेट शून्यावर येतील
- आपल्या राज्यात शिक्षकांना अजिबाद किंमत नाही
- काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर मतांची थाप द्या
- प्रश्न सोडवायला लोकं मनसेकडे येतात
- सत्ता मिळेपर्यंत अपेक्षित कामे होऊ शकत नाहीत
- परप्रातियांमुळे स्थानिक माणूस एक दिवस उझबेकिस्तानमध्ये दिसेल
- भारतातून सर्वाधिक स्थलांतरित लोकं ठाणे जिल्ह्यात
- जातीपातीच्या राजकारणामुळे विकास खुंटला
- मनसेच्या आंदोलनानंतर मोबाइलवर मराठी भाषेची सेवा
- आरेला कारे करण्याची धमक ठेवा
- पंतप्रधान मोदी, अमित शहा महाराष्ट्रातील समस्यांवर का बोलत नाही
- खुल्या प्रवर्गाच्या मुलांना प्रवेशासंदर्भात आश्वासन द्या
- केंद्र सरकारच्या कारभारवर टीका केली, तरी कलम ३७० रद्द केल्यावर शुभेच्छाही दिल्या
- प्रशासनाने चांगले काम केल्यास मी अभिनंदनही करेन. कोत्याचा मनाचा मी नाही
- रिझर्व्ह बँकेने २ हजारच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे आता पुन्हा तुम्ही रांगेत उभे राहणार
- बहुमताच्या आधारावर लहर आली म्हणून नोटा बंद
- निवडणुका गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत तुमच्या नशिबी हेच येणार
- शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जात का पाहिली जातेय
