ठाणे: मागील काही वर्षांपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्रसाठी आक्रमक आंदोलनं करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टोलमुक्त (Toll Freee) आंदोलनाची सुरुवात मुळात मनसेनेच केली होती आणि त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ७० पेक्षा अधिक टोलनाके बंद देखील झाले होते.

मात्र, अजून देखील अनेक ठिकाणी गैरप्रकारे टोलवसुली सुरु असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आणि त्याची सुरुवात ठाण्यातून झाली आहे. ठाण्यातील आनंदनगर येथील टोलनाक्यावर MH 04 या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी मनसेने मानवी साखळी करून सरकार आणि प्रशासनाविरुद्ध आंदोलन केलं. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून कोणत्याही प्रकारे टोल वसूली केली जाणार नाही, असे जाहीर घोषणा केली होती. परंतु, अजूनही ठाणेकरांकडून टोल घेणे सुरूच असून आमदार संजय केळकर जनतेशी खोटं बोलून ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी केला आहे.

सदर आंदोलन ९ नोव्हेंबरला करण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या प्रकरणातील बहुचर्चित खटल्यावर निकाल देणार होतं, त्यामुळे कायदासुव्यस्थेचा विचार करून तसेच पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत सदर आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती आणि तसं अविनाश जाधव यांनी समाज माध्यमांच्या आधारे पक्ष कार्यकर्त्यांना कळवलं होतं. मात्र आता त्या आंदोलनाने पहिलं पाऊल टाकलं असून त्यावर आगामी सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, त्यानुसार आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरणार आहे.

आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती. भविष्यात ही मानवी साखळी टोल नाक्यापासून ते थेट माजिवडा पर्यंत करण्यात येईल असे सांगत यापुढे ठाणेकरांना टोल मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे . परंतु, या टोलच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्याने या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आनंदनगर टोल नाका पार करायला जिथे १० मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे त्या ठिकाणी पाऊणतास वाहन चालकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागते. विशेष म्हणजे ठाणेकरांना तर या टोल नाक्याचा प्रचंड त्रास मागील अनेक वर्ष होत असून केवळ ठाण्यातून मुलुंडच्या हद्दीमध्ये जाण्यासाठी टोल द्यावा लागत असल्याने ठाणेकरांवर हा अन्याय असल्याची ठाणेकरांची भावना आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:

मनसेचं ठाण्यातील आनंदनगर येथील टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी आंदोलन