मुंबई : महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य शासनात ३ वर्षे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची ३ वर्षांची कंत्राटी सेवा, सेवानिवृत्ती वेतनासाठी, सेवानिवृती इतर लाभांसाठी तसेच पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाते. पण महावितरण कंपनीने नियुक्त केलेल्या कंत्राटी कामरचार्यांना हा लाभ मिळत नाही. कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा, असे साकडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना घातले.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी त्यांना ठेकेदारामार्फत मिळत असलेल्या वेतनात तफावत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. केवळ ७ ते ८ हजार रुपये इतके तुटपुंजे वेतन मिळते. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार तसेच समान काम समान वेतननुसार वेतन मिळावे अशी आमची मागणी असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
महावितरण, महापारेषण व महाजनको मधील सहाय्यक पदावरिल कर्मचाऱ्यांना त्यांचा कंत्राटी सेवेचा ३ वर्षाचा कालावधी पुढील कायम सेवेमध्ये समाविष्ट करुन पदोन्नती व इतर बाबींमध्ये होणारे फायदे या महाराष्ट्र शासनाच्या इतर आस्थापनां प्रमाणे मिळ्ण्याबाबत तसेच ठेकेदारांमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेले व १५ ते २० वर्ष तुट्पुंजा पगारावर काम करणाऱ्या कामगारांना कायम स्वरुपी सेवेमध्ये सामावुन घेण्यासाठी व समान ‘काम समान वेतन’ कायदा लागु करावा यासाठी राजसाहेब ठाकरे असे निवेदन दिले. या प्रसंगी श्री.बाळा नांदगावकर, मनसे नेते व शिरीष सावंत अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेना उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या विषयी मुख्यमंत्री व उर्जा मंत्री यांच्यासोबत चर्चा करुन न्याय मिळवुन देण्याबाबतचे आश्वासन उपस्थिताना दिले.
