पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी २०१९ मधील निवडणुकीचे भाकीत केलं आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जशा प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तशीच परिस्थिती २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवणार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते देशाचे पंतप्रधान झाले होते. त्याप्रमाणे २००४ मध्ये जशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती, अगदी त्याप्रमाणेच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा येणार आहे असं पवार म्हणाले.
परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल असं एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज असून, राज्यात सुद्धा महायुती झाली पाहिजे असं पवारांनी सांगितलं आहे. यूपीत जिंकण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची साथ मिळणं अत्यंत गरजेचं असून भाजपने सुद्धा नेहमीच कोणाची तरी साथ घेतली आहे, असं पवारांनी सांगितलं.
दरम्यान, लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि सध्या देशाचं राजकारण युतीनेच चालतं असं पवार म्हणाले. तसेच सर्व पक्षातील नेत्यांशी माझे अत्यंत चांगले संबंध आहेत अस सुद्धा पवारांनी सांगितलं. त्यानुसार निकालानंतर ज्यांच्याकडे बहुमत त्यांना संधी देण्यात येईल असं स्पष्ट केलं.
