नागपूर : आज नागपूर कोराडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचा संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला लगावला आहे. त्यापुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवर अप्रत्यक्ष आणि बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की,’वुई आर नॉट पेपर टायगर्स, मात्र काही आहेत पेपर टायगर्स’ असं विधान केलं. तसेच काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात, असं जोरदार टीकास्त्र केलं. भाजप कार्यकर्ते हेच खरे टायगर्स आहेत आणि आम्ही जनतेत जाऊन काम करणारे लोकं आहोत अशी भाजप कार्यकर्त्यांवर स्तुती सुमन सुद्धा उधळली.
भाजपने केलेल्या कामावरून काँग्रेस पक्ष समाज माध्यमांच्या मार्फत जनतेमध्ये भ्रम पसरवत असल्याचा आरोप त्यांनी थेट काँग्रेस पक्षाच नाव घेत केला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या प्रयत्नांना तर्कशुद्ध माहितीच्या आधारे प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचित केलं. तसेच स्वामिनाथन समितीचा २००५ मध्ये अहवाल येऊन सुद्धा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर काहीच केलं नाही. आता तेच देशभर शेतकऱ्यांचे कैवारी असल्यासारखे आंदोलन करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.
