मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या देशातील खऱ्या व मोठ्या घडामोडींवर आधारित चित्रपटांची निर्मिती होताना दिसतेय. उरी द सर्जिकल स्ट्राइक सारख्या चित्रपटावरून लोकांचाही याला प्रतिसाद आहे असं कळतंय. आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय आहे आर्टिकल ३७०. त्यामुळे याच्यावर या विषयवार चित्रपट येण्याची चर्चा आता सगळीकडेच रंगतेय.
केंद्र सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं देशभरातून स्वागत करण्यात आल. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावर चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या नावासाठी त्यांची पळापळ चालू आहे. इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन फिल्म टीव्ही प्रोड्युसर्स काउन्सिलच्या कार्यालयात निर्मात्यांच्या फेऱ्या सुरु आहेत.
पुलवामा हल्यानंतर पुलवामा द डेडली अटॅक, सर्जिकल स्ट्राइक २.०, बालाकोट आणि पुलवामा अटॅक अशा नावांची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मिती केलेले आनंद पंडित यांनी एका महिन्यापूर्वीच आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए या दोन नावांची नोंद केल्याचं सांगितलं जातंय.
