आसाम : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

एनआरसी मसुदा गेल्या वर्षी ३० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामधून ४०.७ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण ३.२९ कोटी अर्जदारांपैकी २.९ कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता.

दरम्यान, एनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते, अशी भीती भाजप, काँग्रेस, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी व्यक्त केली होती. मात्र या प्रक्रियेला ऑल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.

‘एनआरसी’मध्ये नाव नसल्यास कायदेशीर मदत; अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट