कोलकत्ता : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याचे आरोप हे अन्यायकारक असून त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कुटील हेतू आहे असे मत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे आयआयएम कलकत्ता या संस्थेच्या वार्षिक व्यावसायिक परिषदेत त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काही वेळा बिघडली असतीलही, जशी इतर यंत्रे बिघडतात तशी ही यंत्रेही बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही हे सिद्ध झालेले आहे.

तसेच मतदान यंत्रातील बिघाड व फेरफार यात फरक आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही, जे लोक त्यात फेरफार केल्याचा आरोप करतात त्यांचे हेतू गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्याचा आम्हाला खेद वाटतो. देशातील दोन मोठय़ा सार्वजनिक उद्योगांनी ही यंत्रे तयार केलेली असून ती नामांकित संस्थांचे प्राध्यापक व इतरांच्या देखरेखीखाली तयार केलेली आहेत.

ते असेही म्हणाले की, दैनंदिन वापराच्या अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे मतदानयंत्रेही कधी तरी नीट चालली नाहीत, असे होऊ शकते; पण त्यात मुद्दाम कोणी घोटाळा करू शकत नाही, याची आयोगास ठाम खात्री आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, शरद पवार व राज ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’बद्दल शंका घेणे सुरूच ठेवल्यानंतर अरोरा यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेने मतदान घेणे अशक्य असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. निवडणूक कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि समर्पण भावनेचे सर्व जण कौतुक करतात. आयोगाचे कर्मचारी हे सामान्य लोकांचे रक्षक असतात. राज्य सरकारकडून त्रास दिला जात असेल तर ते तुमचे रक्षण करतील.

दरम्यान, ईव्हीएमवर सर्वात पहिली शंका भारतीय जनता पक्षानेच घेतली होती. २००९ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम’मधील गैरप्रकारावरून खूप आगपाखड करत त्यावर बंदी आणत बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्या असा आग्रह धरला होता. स्वतः लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीर कार्यक्रमात आणि पत्रकार परिषद आयोजित करून ईव्हीएम’मधील गैरप्रकार उघड करत, बॅलेट पेपरची मागणी केली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.

असं असलं तरी काही दिवसांपूर्वी मानस अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालचा दौरा करत याच विषयाला अनुसरून ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्या नंतर एकूणच निरीक्षण केल्यास, मुख्य निवडणूक आयुक्त मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून ते जणू काही एखाद्या पक्षाचे नेते असल्यासारखी विधान करत आहेत आणि त्यांनी एकप्रकारे कॅम्पेनचं सुरु केल्यासारखी एकूण हालचाल आहे असं विरोधकांना वाटत आहे. त्यातच त्यांनी पुन्हा कोलकत्ता येथेच जाऊन पुन्हा नवं विधान केल्याने विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.

अजब दावा? ईव्हीएमवर खापर फोडणे ही गुन्हेगारी मानसिकता: मुख्य निवडणूक आयुक्त