मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आतुरतेने पावसाची वाट बघत होते. अखेर आज केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. केरळमध्ये पाऊस पडल्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते. तसेच दहा जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो असे सर्वांनाच झालं आहे. मागील काही दिवसांपासून लक्षद्वीप बेट, कर्नाटक, केरळ किनारपट्टीलगतच्या काही ठिकाणी पाऊस पडला. या ठिकाणच्या साठ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रात २.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतरच हवामान विभागाने मान्सून सक्रीय झाल्याचं म्हटलं आहे.
केरळात पावसाचे आगमन झाल्यावर साधारण आठवडाभरात राज्यात पाऊस दाखल होतो. वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. दरम्यान मान्सून दाखल होण्याआधी वर्धा, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. तसंच शनिवार ८ जूनला मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, वरळी, लोअर परेल, कांदिवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
