गुवाहाटी: दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे.

बद्रुद्दीन अजमल यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, मुस्लिम मुलांना जन्म घालायचे थांबवणार नाहीत. ते कोणाचेही ऐकणार नाहीत. सरकारने आता मुस्लिमांना सरकारी नोकरीपासून दूर ठेवण्यासाठी कायदा केला आहे. सच्चर समितीच्या अहवालानुसार २ टक्क्यांच्या खाली लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. मुस्लिम समाजातही आता सुशिक्षितांची संख्या वाढत आहे, असे बद्रुद्दीन अजमल यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी आसाम सरकारच्या मंत्रिमंडळानं दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी न देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवकरच हा प्रस्ताव विधानसभेत येणार आहे. आसाममध्ये भाजप सरकार बहुमतात असल्यानं हा कायदा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अजमल यांनी आधीच विरोधाची भूमिका घेतली आहे.

कितीही कायदे करा, मुस्लिम जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणारच: अजमल