नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदीला ओला-उबरला जबाबदार धरले होते. त्यावर सर्वच स्तरातून भाजपवर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बोर्ड ऑफ ट्रेड मीटिंगमध्ये बोलताना गोयल यांनी हे विधान केलं. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते. आइन्स्टाइन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असं गोयल यांनी सांगितलं होतं.

गोयल यांच्या या वक्तव्यावर सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही जोरदार टीका केली आहे. ‘अर्थव्यवस्थेच्या गणिताची जाणीव होण्यासाठी सरकारने डोक्यावर सफरचंद पडण्याची वाट पाहू नये. हे सांगण्यासाठी आम्हाला आइन्स्टाइनचीही (न्यूटनची माफी मागून) गरज नाही. भविष्यातील स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत केलं तर बरं होईल,’ असा टोला येचुरी यांनी लगावला आहे.

भविष्यातील स्वप्नांमागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत करावं: सीताराम येचुरी